![](https://activemarathinews.co.in/storage/2024/07/IMG-20240629-WA0018-780x470.jpg)
मुंबई, दि. 1 जुलै.
मुंबईतील महत्वाच्या व मोक्याच्या जमिनी सरकारच्या उद्योपती मित्रांच्या घशात घालण्याचे काम सुरु आहे. धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली १.५ लाख कुटुंबांना बेघर करण्याचा डाव असून त्या विरोधात संघर्ष सुरु आहे. आरेतील वृक्ष तोड असो वा कुर्ल्यातील डेअरची जागा, पर्यावरणदृष्या महत्वाच्या जमिनी लुटण्याचे काम सुरु असून त्या विरोधात लढा सुरु आहे. कुर्ला डेअरीची जमीन बांधकामासाठी वळवणारा जीआर त्वरित मागे घ्यावा आणि ही जागा मुंबईच्या विकास आराखड्यात
“सार्वजनिक उद्यान म्हणून राखीव करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा एकनाथ गायकवाड यांनी केली आहे.
कुर्ला डेअरीची जमीन बळकावण्याच्या विरोधात नेहरू नगरमधील रहिवाशांनी एकत्र येऊन मोहीम सुरू केली आहे. यात खासदार वर्षा गायकवाड यांच्यासोबत शिवसेना नेते व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आम्ही विकासाच्या विरोधात नाही पण विकासाच्या नावाखाली महत्वाच्या व मोक्याच्या जागा जर धनदांडग्यांच्या घशात घालून स्थानिकांना विस्थापित करणार असाल तर ते आम्ही होऊ देणार नाही. विकासाच्या नावाखाली जमिनी लुटण्याचे काम सुरु आहे. मुंबईत आज सर्वात मोठी समस्या मोकळ्या जागांची आहे, मुलांना खेळायला जागा नाही, श्वास घेता येत नाही असे असताना ही निसर्गसंपन्न जागा कशासाठी द्यायची. आरे कॉलनीतील वेताळ टेकडीचाही मुद्दा आहे. आरेची लढाई अजून सुरुच आहे. झाडे तोडून निसर्ग संपवले जात आहेत. मदर डेअरीची जमीन असो, मुलुंडची असो वा देवनार, कोरबाची वा मीठागरांच्या जमिनी असतील. या जमिनी सरकारच्या आहेत, स्थानिक लोकांच्या आहेत त्या त्यांनाच मिळाल्या पाहिजेत. महाविकास आघाडी लवकरच महाराष्ट्रात पुन्हा सत्तेत येणार आहे. आदित्य ठाकरे आणि आम्ही मिळून येथील रहिवाशांना आश्वासन दिले की जर या सरकारने आपला निर्णय मागे घेतला नाही तर मविआ सत्तेत आल्यानंतर मात्र हे काम नक्की करू आणि मुंबईची लुट करण्यासाठी जे जबाबदार आहेत त्या सर्वांची चौकशी करून त्यांना तुरुंगात टाकू.
कुर्ला डेअरी वाचवण्यासाठी गेल्या आठवड्याच्या सामुहिक स्वाक्षरी मोहिम घेण्यात आली तर आज ‘गांधीगिरी’ आंदोलन करण्यात आले. मुंबईतील हिरवी फुफ्फुसे वाचवा आणि मुंबईची लूट करणे थांबवा अशी विनंती करणारी हजारो पोस्टकार्ड पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवली जाणार आहेत अशी माहितीही खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली.